दोन समांतर रेषा कधीही जुळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत… पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. पराकोटीच्या तिरस्कारातूनसुद्धा सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुटतो इतकी ताकद प्रेमात असते. ती व्यक्ती समोर आली की नकोशी वाटते पण नजरेआड होताच जीवाची घालमेल होते. सिद्धी आणि शिवाच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. अशी परिस्थिती उदभवते की सिद्धी – शिवा यांना बेसावधपणे लग्नाच्या बंधनात अडकवलं जातं आणि मग कसोटी लागते प्रेमाची. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांमध्ये प्रेम भावना निर्माण होईल का ?तिरस्काराच्या धगधगत्या निखाऱ्यावर शिवा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलू शकेल ? सिद्धी आणि शिवा ह्या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा “जीव झाला येडापिसा” १ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. नवोदित विदुला चौघुले सिद्धीची भूमिका आणि अशोक फळदेसाई शिवाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, चिन्मयी सुमित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रुद्रायत या गावामध्ये मध्यमवर्ग कुटुंबामध्ये वाढलेली सिद्धी गोकर्ण ही स्वाभिमानी, तत्वनिष्ठ आणि जगाच्या चांगुलपणावर खूप विश्वास असलेली मुलगी आहे. “मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा”असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवा अत्यंत धडाडीचा, शीघ्रकोपी, बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा असा रांगडा गडी आहे. सिद्धी आणि शिवा दोघेही परस्परविरोधी माणसं कुठल्या परिस्थितीत लग्नबंधनात अडकतात ?एकमेकांबद्दल असं कुठलं सत्य आहे जे दोघांना माहिती नाही ? तिरस्काराचा भडका प्रेमाची ऊब बनून सिद्धी-शिवाला कसं एकत्र आणेल; हा प्रवास बघणं रंजक असणार आहे. याच दिवसापासून सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका रात्री ९.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेच्या निमित्ताने प्रमुख, कलर्स मराठी – वायकॉम18 चे निखिल साने म्हणाले, “या मालिकेच्या निमित्ताने प्रमुख,कलर्स मराठी – वायकॉम18 चे निखिल साने म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्ही वेगवेगळे प्रयोग केले. सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी आणि एकदम कडक सारखे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणले ज्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. मालिकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही वास्तवादी मालिका लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत बाळूमामाच्या नावानं चांगभलं हे त्यातलच एक उदाहरणं आहे. आणि आता “जीव झाला येडापिसा” ही मालिका आम्ही घेऊन येत आहोत अर्थातच ही वेगळी गोष्ट आहे, ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित प्रेमकथा आहे. दोन नव्या कलाकारांना घेऊन आम्ही ही कथा सादर करत आहोत. कथेची मांडणी, प्रसंग, चित्रीकरण, मालिकेतील पात्र यामुळे ही मालिका वास्तवादी आणि प्रेक्षकांना आपलीशी वाटेल. मालिकेमध्ये काही राजकारणाची पार्श्वभूमी असलेली पात्र देखील आहेत ती देखील अवतीभवतीची वाटतील. जीव झाला येडापिसा द्वारे वास्तवादी मालिका आणि एक वेगळ्या प्रकारची प्रेमकथा सादर करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यामुळे आशा आहे की,प्रेक्षकांना मालिका आवडेल”.”.
चिन्मय मांडलेकर म्हणाला, “जीव झाला येडापिसा” ही सिद्धी – शिवाची ही गोष्ट आहे. प्रत्येक लग्नामागे एक प्रेमकथा असते परंतु या मालिकेमध्ये मात्र सिद्धी – शिवाचं लग्नच मुळात द्वेषातून होतं. एका घटनेमुळे सिद्धीच्या मनात शिवाबद्दल गैरसमज आणि शिवाच्या मनात सिद्धीबद्दल वितुष्ट निर्माण होत, आणि असे एकेमेकांचा द्वेष करणारे दोघ लग्न बंधनात बांधले जातात. या दोघांचा द्वेषापासून प्रेमापार्यतचा प्रवास म्हणजे ही मालिका. ही मालिका इतर मालिकांपेक्षा दोन गोष्टीमुळे वेगळी आहे एक म्हणजे बऱ्याचदा मालिका नायक – नायिकेच्या अवतीभोवती फिरणाऱ्या असतात यामध्ये इतर पात्र, त्यांच्या भूमिका देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, दुसरं म्हणजे मालिकेचे संपूर्ण शुटींग सांगलीमध्ये होणार आहे. जेवढी मजा आम्हांला शुटींग करताना येत आहे तितकीच प्रेक्षकांना देखील येईल याची मला खात्री आहे”
मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक विनोद लव्हेकर म्हणाले, “ज्या व्यक्तीचा आपण दु:स्वास करतो त्याच्याबरोबर जेंव्हा आयुष्याची गाठ बांधली जाते तेंव्हा काय घडतं ही गोष्ट या मालिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे… आयुष्यामध्ये “दृष्टीकोन” महत्वाचा असतो तो बदलला कि सगळं बदलत असं म्हणतात, आपण गृहीत धरून चालतो कि हा माणूस वाईटच आहे पण खरंच आपल्याला दिसत तसंच असतं का ? की आपण आपला दृष्टिकोनच तसा बनवला असतो… तसचं काहीसं सिद्धी आणि शिवाचं देखील आहे. जीव झाला येडापिसा या मालिकेद्वारे आम्ही सिद्धी आणि शिवाची एक वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. पहिल्यांदाच आम्ही वेगळ्या पद्धतीची गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेद्वारे आम्ही विदुला आणि आकाश यांची नवीन, फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटील घेऊन आलो आहोत. उत्तम टीम असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात अगदी तसंच या मालिकेबद्दल देखील घडलं… सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. आम्हांला खात्री आहे प्रेक्षकांना आमची ही नवीन मालिका नक्की आवडेल”.
लग्न म्हणजे सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीची इच्छा असते की, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा… परंतु सिद्धी मनात गैरसमज घेऊन शिवाच्या घरी लग्न होऊन येते आणि या गैरसमजाची जागाच द्वेष घेतो… द्वेषाच्या आभाळावर सिद्धी हसऱ्या नक्षत्रांचे तोरण बांधु शकेल ? तेंव्हा नक्की बघा सिद्धी आणि शिवाची रांगडी प्रेमकथा “जीव झाला येडापिसा” १ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.