कायमच काही आव्हानात्मक भूमिकांना न्याय देणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याने त्याच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाविषयी एक मोठी बाब सर्वांसमोर मांडली आहे. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ tanhaji या चित्रपटातून ज्या पद्धतीने इतिहासाची छेडछाड करण्यात आली आहे, ही बाब चुकीची असल्याचं सैफने नुकतच एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा ‘तान्हाजीः द अनसंय वॉरियर’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तान्हाजी चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला आहे, असे मत अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाबद्दलची आपली मते मांडली आहेत.

उदयभान राठो़ड हे पात्र आपल्याला भावल्यामुळेच आपण त्याचा स्वीकार केल्याचंही त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. चित्रपटातून मांडण्यात आलेला इतिहास हा काही अंशी चुकीचा असल्याची बाबही त्याने स्वीकारली. पण, व्यावसायिक चित्रपटाच्या यशासाठी या तंत्राचा अवलंब अनेकदा केला जात असल्याची बाब पुढे करत त्याने आपल्या वक्तव्यामध्ये समतोल साधला. मुख्य म्हणजे चित्रपटसृष्टीची ही भूमिका प्रशंसनीय नसली तरीही ती नाकारताही येत नाही, ही वास्तविकताही त्याने या मुलाखतीतून न विसरता मांडली.

या चित्रपटातील कथा राजकारणाच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात बदलण्यात आली आहे. ही बाब गंभीर तसेच चुकीची आहे. चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर या भूमिकेच्या मी प्रेमात होतो, त्यामुळे यावर ठोस मत मांडू शकलो नाही, असे सैफ म्हणाला. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या. भूमिका सोडायची नव्हती. त्यामुळे काहीच बोलू शकलो नाही. मात्र, पुढील वेळी योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य भूमिका घेण्याचे धाडस मी करेन, असेही त्याने सांगितले.

इंडिया ही संकल्पना ब्रिटिशांनी देशात रुजवली. त्याआधी ती नव्हती, असे माझे मत आहे. चित्रपटाच्या आधारे आपण कोणताही तर्क मांडू शकत नाही, असे सांगत अनेक कलाकार उदारमतवादाचा पुरस्कार करतात. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात बाकी सर्व गोष्टी विसरतात, हे दुर्दैवी आहे, असा टोलाही त्याने लगावला.

देशाची फाळणी झाली, तेव्हा आमच्या कुटुंबातील काही जण देश सोडून गेले. आमचा परिवार इथेच राहिला. कारण, आपण धर्मनिरपेक्ष देशात आहोत, याची जाणीव त्यांना होती. मात्र, आजच्याघडीला ज्या पद्धतीने देशात घडामोडी सुरू आहेत, त्या पाहता आगामी काळात देश धर्मनिरपेक्ष राहणार नाही, अशी भीती सैफने व्यक्त केली. देशातील घडामोडींवर आम्ही मते व्यक्त केली की, चित्रपटांवर बंदी घातली जाते, बहिष्कार घालण्याचा आवाहन केले जाते. लोकांचे नुकसान केले जाते. म्हणूनच कोणी यावर बोलत नाही, असेही तो म्हणाला.

एकिकडे आपण उदारमतवादाची चर्चा करतो आणि दुसरीकडे आपण लोकप्रितेच्या राजकारणाला आपलंसं करतो, असं सूचक विधान सैफने केलं. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण, तरीही एक वर्ग असाही आहे ज्याच्याकडून या चित्रपटातून मांडण्यात आलेल्या काही ऐतिहासिक संदर्भांना विरोध केला जात आहे. त्यावर आता खुद्द सैफनेच प्रतिक्रिया दिल्यामुळे या विषयाला चालना मिळाली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.