अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्या तेजाज्ञा फॅशन ब्रॅन्ड व्दारे सातत्याने नाविन्यपूर्ण कलेक्शन्स आणत असतात. डेनिम कलेक्शन, नथ दुप्पट्टा कलेक्शन, सिल्व्हर ज्वुलरी कलेक्शन अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सनंतर आता तेजाज्ञा ‘दागिना कलेक्शन’ घेऊन आलंय.

ह्या दागिना कलेक्शव्दारे पहिल्यांदाच साडीला दागिन्याचे अनोखे डिझाइन असण्याचा एक्सपिरीमेन्ट झाला आहे. साडीच्या पुढील बाजुवर गळ्याजवळ आणि ब्लाउजवर दागिन्याचे डिझाइन असलेल्या साड्यांचे कलेक्शन लाँच झाले आहे.  आपल्या डिझाइनर वेअरमधून पारंपरिकतेला आधुनिकेतेची जोड देण्याचा प्रयत्न करणा-या तेजस्विनी पंडितला ही आगळी कल्पना  सुचली.

तेजस्विनी पंडित ह्याविषयी अधिक माहिती देताना म्हणते, “सणसमारंभावेळी तयार होताना दरवेळी प्रत्येकीला पडणारा कॉमन प्रश्न असतो, तो म्हणजे आता ह्या साडीवर कोणते दागिने घालू? हा प्रश्न सोडवण्याच्या कल्पनेतून ह्या कलेक्शनचा जन्म झालाय, अस म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे नेहमीच साडीचा पदर भरजरी असावा, किंवा त्यावर जास्तीत जास्त काम असावं, ह्याकडे लक्ष दिलं जातं. पण आता जमाना सेल्फीचा आहे. त्यामुळे साडीच्या पल्लुपेक्षाही अधिक, गळ्याविषयीचा विचार आजकाल स्त्रीया जास्त करतात, हे माझ्या लक्षात आलं. म्हणूनच पहिल्यांदा मी साडीच्या समोर येणा-या बाजुवर जास्त काम करण सुरू केलं. “

तेजाज्ञाच्या डिझाइनर कलेक्शनमध्ये साडीसोबतच नेहमी ब्लाउजचाही विचार होतो. तसे डिझाइनर ब्लाउजही साडीसोबतच दिले जातात. ह्याविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “एकाक्षणी माझ्या असं लक्षात आलं की, हे पुरेसे नाही आहे. साडी घालतानाच ब्लाउजचा गळा कसा असावा ह्यासोबतच गळ्यात काय घालायला हवं, ह्याचाही आपल्याला विचार करावा लागणार. आणि मग ही कल्पना सुचली. तेजाज्ञाच्याच भाग असलेल्या सुनीता कुलकर्णी ह्यांनी ही कल्पना सत्यात उतरवायला मला मदत केली. त्यांनी दागिन्यांची हुबेहुब दिसणारी डिझाइन येईल यावर काम केले. हे डिझाइन मी काही जवळच्या मैत्रिणींना अभिप्रायासाठी दाखवले. त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांवरून हे बाकी स्त्रियांनाही आवडेल, हा विश्वास वाटल्यावर आता हे कलेक्शन घेऊन आम्ही आलो आहोत.”

ह्याविषयी अभिनेत्री अभिज्ञा भावे सांगते, “पुतळी हार, कोल्हापूरी साज, तन्मणी, शिवमुद्रा आणि पैठणीचे मुलभूत डिझाइन ह्या डिझाइन्समध्ये सध्या हे कलेक्शन उपलब्ध असेल. आण आता  श्रावणापासून सण-समारंभाला सुरूवात होते. मंगळागौर, रक्षाबंधन, गणपती-गौरी, नवरात्री, दिवाळी, आणि नंतर लग्नकार्य ह्यांमध्ये आता काहीतरी नवं आणि एक्स्क्लुजिव घालू असं प्रत्येकीलाच वाटतं. म्हणून मग हे कलेक्शन आम्ही लाँच करतो आहोत.”