कोल्हापूर, सांगली, सातारा या महाराष्ट्रातील भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, इतर जीवनावश्यक साहित्य या सर्व गोष्टी पूरग्रस्तांपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, आज श्रमदानाचीही तितकीच गरज आहे. नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीतर्फे यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वाहिनीच्या माध्यमातून एक ‘युवा फोर्स’ कोल्हापूर व सांगली भागात पोचून तिथल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करणार आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून ‘युवा फोर्स’ हा उपक्रम वाहिनीने हाती घेतला आहे.

रोज घराघरांत आनंद पोचवणारी वाहिनी, आज घर पुन्हा उभारण्यासाठी पूरग्रस्तांना आधार व धीर देणार आहे. वाहिनीकडून, सर्वांनी या मदतकार्यात सहभागी व्हावे याचे आवाहन करण्यात येत आहे. भारतीय जवानांनी या सर्वांना सुखरूप, सुरक्षित स्थळी पोचवण्याची जबाबदारी पार पाडली आहे. आज त्या सर्वांची एक माफक अपेक्षा आहे, ती म्हणजे; ‘पाठीवरती हात ठेऊन फक्त लढा म्हणा’!’ झी युवा वाहिनीच्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन, सर्वांनी एकत्र येऊन, पुनर्वसनासाठी काम करायला हवं. सामाजिक भान राखत, आपली ‘युवा फोर्स’ दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन, खांद्याला खांदा लावून श्रमदान करण्याची इच्छा असणाऱ्यांनी ९१०७०७२४२४ या क्रमांकावर मिस कॉल द्या. त्यानंतर मेसेजमधून आलेल्या लिंकवर योग्य ती माहिती भरून, तुम्ही या मदतकार्यात सहभागी होऊ शकता.