महाभारत या पौराणिक कथेचे महत्त्व भारतीय मंडळींना वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. हेच महाभारत, छोट्या पडद्याच्या माध्यमातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळालेली आहे. पण जर हेच महाभारत चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलं तर? तसंच हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक  सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक, संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला तर प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच असेल. अर्थात, संजय दादा ‘महाभारत’ घेऊन येणार असल्याने, सिनेमात ‘कोण कलाकार असणार?’ हा प्रश्न सध्या खूपच चर्चेत आहे. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, साई ताम्हणकर ही संजय दादांच्या सिनेमातून नेहमी दिसणारी मंडळीच ‘महाभारत’मध्ये पाहायला मिळणार, की नव्या कलाकारांना संधी मिळणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘झी टॉकीज’ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सोहळ्यात हाच प्रश्न संजय जाधव यांना विचारण्यात आला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिमाखदारपणे संपन्न झालेल्या या सोहळ्यात, सागर कारंडे याने संजय दादांना हा प्रश्न विचारला. कॉमेडी स्कीट्स, डान्स आणि मनोरंजनाच्या सर्व प्रकारांनी पूरेपूर भरलेल्या या सोहळ्यात, संजय दादांनी नेमकं काय उत्तर दिलं, हे जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९’ पाहावं लागेल. येत्या रविवारी १२ जानेवारी रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता हा रंगतदार सोहळा पाहायला मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर हवं असेल आणि अशाच इतरही काही गमतीजमती पाहायच्या असतील, तर रविवारी संध्याकाळी ‘झी टॉकीज’ लावायला विसरू नका.