मित्रांनो! ‘बिग बॉस हा कार्यक्रम जितका लोकप्रिय आहे तितकाच तो विवादितसुद्धा मानला जातो. कधी आपल्या शोच्या फॉरमॅटमुळे तर कधी स्पर्धकांमुळे या शोची चर्चा होत असते. ‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे त्या प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. मात्र आजारी असल्याचं कारण देत त्यांनी या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

तर नुकताच त्यांनी वारकरी संप्रदायातील जेष्ठांची आणि सर्व प्रेक्षकांची माफीसुद्धा मागितली आहे. एबीपी माझा या प्रथितयश चॅनलशी बोलतांना शिवलीला पाटील यांनी वरील सर्वांची माफी मागितली आहे. या मुलाखतीत शिवलीलाने म्हटलं आहे, ‘मी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने माझा सर्व वारकरी संप्रदाय आणि माझे सर्व ज्येष्ठ लोक माझ्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे मी या सर्वांची दोन्ही हात जोडून आणि मस्तक टेकून माफी मागते.

कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक. मात्र, आपल्या धर्माची संस्कृती, आपला संप्रदाय, माझे कीर्तन माझी तुळशी माय अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले. मात्र, तिथं राहून मी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. मी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन तुळशी पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपली. पण, एक महिला कीर्तनकार आहे. म्हणून विरोध होत असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, शिवलीला पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर झाल्या.

शिवलीला पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्यानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटना त्यावर नाराज होत्या. त्याशिवाय, बिग बॉससंदर्भात माफी मागत नाही तोपर्यंत शिवलीला पाटील यांच्या किर्तनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही काही कीर्तनकार संघटनांनी केलं होतं. दरम्यान, वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यानं शिवलीला पाटील यांनी एबीपी माझाशी बोलतानाच वारकरी संप्रदाय आणि वरिष्ठांची माफी मागितली होती.

विशेष म्हणजे नवरात्रीनिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळानं शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्याला मोठी गर्दीही जमली. त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.