मित्रांनो!, फिल्म जगतातील या झगमगाटाचे आपल्याला एक सर्वसामान्य रसिक प्रेक्षक म्हणून नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. या लोकांचे राहणीमान, यश, कीर्ती, पैसा, प्रेमप्रकरणे, लग्नं आणि चक्क घटस्फोट सुद्धा. हे लोक कधी लग्नं करतील, कधी ब्रेकअप करतील आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण कधी ब्रेकअप वा घटस्फोटानंतर परत नव्याने प्रेमात पडून पुन्हा लग्नं करतील याचा काहीही नेम सांगता येत नाही बरें.

आजच्या या लेखाचा विषयच मुळी हा आहे की…ब्रेकअप के बाद… पुन्हा नव्याने प्रेमात पडून शुभमंगलपर्यंत पोहचलेले मराठी सेलिब्रिटी. चला तर मग… जाणून घेऊयात.अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पत्नी पहिली दीपा मेहता कॉस्च्युम डिझायनर होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मेधाशी लग्न केलं.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना गिरीजा ओक ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर गिरीश यांनी पल्लवीशी दुसरं लग्न केलं. गिरीश आणि पल्लवी यांना दुर्गा ही मुलगी आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने काही वर्षांपूर्वी अमेय निपाणकरशी लग्न केलं होतं. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. घटस्फोटानंतर शर्मिष्ठाने नुकतीच तेजस देसाईशी लग्नगाठ बांधली.

‘मी अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता विजय आंदळकर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. तो अभिनेत्री रुपाली झंकारशी लग्न करणार आहे. रुपालीने ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केले आहे. विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पुजा पुरंदरेशी झाले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेताला. पूजा सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीने २००५ मध्ये अपर्णाशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर २००९ मध्ये ते विभक्त झाले. नंतर स्वप्नीलने २०११ मध्ये लीना आराध्येशी लग्न केलं.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१४ मध्ये दोघांनी लग्न केलं पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. नंतर अभिनेता शशांक केतकरने प्रियांका ढवळेशी लग्न केलं.

अभिनेत्री अभिज्ञा भावेनं २०१४ मध्ये वरुण वैटिकरशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. अभिज्ञाने मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. मुंबईमध्ये ६ जानेवारी २०२१ रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

‘हे मन बावरे’ मालिकेतील अभिनेता संग्राम समेळ दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. संग्रामने डान्सर श्रद्धा फाटकशी लग्न केले आहे. इचलकरंजी येथे त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. संग्रामने २०१६मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते. पल्लवीने ‘रुंजी’ या मालिकेत काम केले. संग्राम आणि पल्लवीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता संग्रामने श्रद्धासोबत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि प्रमाणिक कलाकार म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरकडे पाहिलं जातं. सिद्धार्थचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यापैकी एक अभिनेत्री मुग्धा परांजपे. काही वर्ष डेट केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली आहे. अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता श्रेयस राजे रिलेशनशिपमध्ये होते. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. सिद्धार्थ चांदेकरने अभिनेत्री मिताली मयेकरसोबत २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाडा येथे लग्नसोहळा पार पडला.

तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळकचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्री आयुषी भावेसोबत सुयशचा साखरपुडा पार पडला. याआधी सुयश टिळक ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘पाठकबाई’ म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

हिंदी टीव्ही अभिनेता संजीव सेठशी रेशम टिपणीसने १९९३ मध्ये लग्नगाठ बांधली आणि २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. सध्या रेशम संदेश किर्तीकर या तिच्या जिवलग मित्राला डेट करत असल्याची चर्चा आहे. हे दोघं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जातं.

‘बिग बॉस मराठी’ फेम मेघा धाडे लग्नापूर्वी गरोदर होती. आदित्य पावस्करशी लग्न करण्यापूर्वी मेघाने एकल मातृत्वाची जबाबदारी पार पाडली.

‘अस्मिता’ फेम अभिनेता पियुष रानडे व शाल्मली तोळ्ये हे लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. २०१० मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली पण लग्नाच्या चार वर्षांनंतर २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पियुषने नंतर २०१७ मध्ये अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न केलं.