बिग बॉस मराठी संपल्यानंतरही माधव देवचके, नेहा शितोळे, हिना पांचाळ, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेने आपली मैत्री जपली आहे. माधव देवचकेच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नेहा आणि हिना आल्या होत्या. बाप्पाच्या दर्शनानंतर माधवने आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला व्हिडीयो कॉल केला आणि मग हिना, माधव, नेहा, आरोह आणि शिवानीच्या बराचवेळ गप्पा रंगल्या. ह्या गप्पांनंतर माधव, हिना आणि नेहाने घरात खूप धमाल केली.

सूत्रांच्या अनुसार, अभिनेता माधव देवचकेच्या घरी दरवर्षी गणपती दर्शनाला त्याचे शाळा-कॉलेजपासून ते फिल्म इंडस्ट्रीतले बरेच मित्र-मैत्रिणी येतात. आता ह्यामध्ये हिना, नेहाचीही भर पडलीय. त्याला बिग बॉसमध्ये मिळालेल्या ह्या दोन मैत्रिणींशी त्याचे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जुळले. ह्या नेहा-हिनाने माधवच्या घरी खूप धमाल केली. त्याच्या सर्व घरच्यांसोबत भरपूर गप्पा मारण्याशिवाय त्या तिघांनी एक मस्त डान्सही केला. ज्याचा व्हिडीयो माधवने नंतर आपल्या सोशल मीडियावर टाकला.

नेहा आणि हिना गणपती दर्शनासाठी घरी भेटायला आल्या त्यामुळे माधवला खूप आनंद झाला. तो म्हणतो, “गेल्या 60 वर्षांपासून आमच्या घरी गणपती बसत आहे पण हे वर्ष आमच्यासाठी अधिक खास आहे कारण बिग बॉसच्या घरातल्या दोन नव्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या आहेत.”

माधव आणि त्याच्या घरच्यांना भेटून नेहा म्हणाली, “माधवच्या घरी मी पहिल्यांदाच गणपतीसाठी आले आहे. पण माधवच्या घरची मंडळी इतकी गोड आहेत की मला अजिबात असं वाटत नाहीये की मी पहिल्यांदाच त्यांना भेटते आहे. मुंबईतलं माझं घर सोडून आता अजून एक नविन घर मला मिळालय. मी बऱ्याचदा कामानिमीत्त मुंबईत असल्यामुळे घरात गणपती बसवणे खूप मिस करते पण यावर्षीपासून आता माधवच्या घरी गणपती येत असल्याने घरी नसणे मी मिस करणार नाही.”

हिना आणि माधवचे बिग बॉसच्या घरात काही वेळेला मतभेद, कडाक्याची भांडणं झाली होती. परंतू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ते सारे रुसवे फुगवे विसरून ते पुन्हा नव्याने मित्र म्हणून भेटले. त्याविषयी हिना म्हणते, “बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा कुठल्याच स्पर्धकांशी माझी ओळख नव्हती. पण बिग बॉसच्या घरातून परत आल्यावर बाहेरच्या जगात त्यांच्या बरोबर जगणं खूप वेगळी आणि मस्त फिलींग आहे. बिग बॉसच्या घरामूळे मला खास दोस्त, बेस्ट बडीज मिळाले. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांबरेबर भांडणं होतात पण बाहेर आल्यावर ते विसरून सगळे पुन्हा खूप छान मित्र होतात.”