ग्रामीण भारतातील सामान्य माणसाचे आयुष्य सुसह्य बनवणाऱ्या, त्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे, सुरक्षित निवारा मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या भारत सरकारच्या अतिशय महत्वपूर्ण अश्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला कश्याप्रकारे होत आहे ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जयपाल मोतीराम वाघथरे.

सन २०२२ पर्यंत २ कोटी ९५ लाख घरं बांधण्याचे आपले उद्दिष्ट भारत सरकार लवकरच पूर्ण करेल असे जयपाल मोतीराम वाघथरे ह्यांच्यासारख्या अनेक सामान्य व्यक्तींकडे पाहून वाटते. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ घेऊन आपल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या घराचा कायापालट करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील, खडकी/बामणी ह्या खेडेगावातील रहिवाशी असलेल्या जयपाल मोतीराम वाघथरे ह्यांची कहाणी ऐकुया त्यांच्याच शब्दात….

अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा. आपले हक्काचे घर असावे, आपल्या कुटुंबाच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर असावे असे कुणालाही वाटणे साहजिकच आहे. पण घर बांधणे, किंवा घर विकत घेणे हे सामान्य माणसांसाठी जरा कठीणच. एकतर जागेच्या किमती वाढलेल्या व बांधकाम खर्चही वाढत आहे.

अश्या परिस्थितीत एका गरीब, सामान्य माणसाने स्वतःचे घर असावे हे स्वप्न पाहणे तसे धाडसाचेच समजले जायचे, पण जेव्हापासून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना नावाची एक अतिशय कल्याणकारी योजना केंद्र सरकारने आणली, तेव्हापासून प्रत्येक सामान्य भारतीय माणूस व विशेषतः ग्रामीण भागातील माणूस घर घेण्याचे केवळ स्वप्नच पाहतोय असे नाही तर ते सत्यातही उतरवत आहे. प्रधानमंत्री आवास योजना हि काही समाजातील एका विशिष्ट वर्गासाठी अथवा घटकासाठीच लागू आहे असे नाही तर ह्या योजनेतील अटी व निकष पूर्ण करणारा प्रत्येक भारतीय नागरिक ह्या योजनेचा लाभ घेऊन आपला हक्काचा निवारा मिळवू शकतो.

या योजनेस भारत सरकारने 23 मार्च 2016 रोजी मंजूरी दिली. भारताच्या केवळ शहरी भागातच नाही तर निमशहरी व ग्रामीण भागातही ह्या योजनेमुळे लोकांना आपल्या हक्काचे घर मिळाले. हि कथा आहे एका अश्या सामान्य माणसाची ज्याने ह्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या घराचा कायापालट केला. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ जनसामान्यांना कश्याप्रकारे होत आहे हे जर तुम्ही जाणून घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हि कथा एकदा वाचाच जयपाल वाघथरे म्हणतात

गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगावात माझे स्वतःचे घर होते. पण अश्या मोडकळीला आलेल्या घरात संसार करावा तर कसा ? असा प्रश्न मला पडत होता. कारण जसा जसा पावसाळा जवळ येत असे तसतशी माझी चिंता जास्तच वाढत असे. कारण पावसाच्या तडाख्यामध्ये माझ्या घराचे छप्पर कधी कोसळून पडेल ह्याचा काही नेम नव्हता. घराची हालत एवढी खराब झाली होती कि रात्री पाऊस चालू झाल्यावर जीव मुठीत घेऊन बसावं लागत होतं. असं जुनंपुराणं घर पाडून ते नवीन बांधावं असं खूप वाटायचं पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा ह्याचा विचार केला कि काहीच सुचत नव्हतं.

पण एक दिवस मला सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहिती मिळाली आणि मला एक आशेचा किरण दिसू लागला. ह्या योजनेबद्दल अजून माहिती काढायची असं मी ठरवलं. सगळी माहिती काढून झाल्यावर मात्र मी एकही दिवस वाया न घालवता सगळ्या कागदपत्रांची जमवाजमव केली आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या गावच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज केला अन माझा अर्ज लवकरच मंजूर सुद्धा झाला.

२०१८ सालच्या एप्रिल महिन्यात माझा अर्ज मान्य झाला अन माझ्या जुन्यापुराण्या मोडकळीला आलेल्या घराचा चेहराच बदलून गेला. आता माझ्या मोडकळीला आलेल्या घराच्या जागी पक्क घरकुल उभं आहे. आता पावसाची कोणतीच चिंता उरली नाही. शासनाचे खूप खूप आभार.