Dharmaveer लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून तर सर्वच जण अवाक् झाले आहेत. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. एकाच आठवड्यात समाजमाध्यमांवर सत्तर लाखांहून अधिक व्ह्युव्जचा टप्पा या टिझरने ओलांडला. याच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबई येथे अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे संगीत प्रकाशन पार पडले.

या चित्रपटाबद्दल आणि प्रसाद ओक यांच्या भूमिकेबद्दल ही उत्सुकता वाढलेली असतानाच आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या नावाचा उलगडा या सोहळ्यात करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे यांना गुरुच नव्हे तर देव मानणारे आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते साकारणार आहे. प्रसाद ओक यांच्याप्रमाणेच क्षितिज दातेचाही लूक एकदम हुबेहुब जुळून आला आहे हे विशेष. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत.

मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेते प्रसाद ओक आणि क्षितिज दाते त्यांच्या चित्रपटातील लुकमध्ये मंचावर अवतरले आणि त्यांना बघून उपस्थित असलेले सर्वच जण अवाक् झाले. यावेळी बोलतांना प्रसाद ओक म्हणाले की ,”आपण या चित्रपटाच्या टिझर मधून एक फार सुंदर वाक्य ऐकलं ते म्हणजे, ‘सर्वच राजकारणी सारखे नसतात,काही आनंद दिघे सुद्धा असतात’ लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केला त्याचं भावनेने मंगेश देसाई यांनी आनंदोत्सव केला.आनंद मूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला आणि त्या मूर्तीला अतिशय सुरेख रूप दिलं आणि त्या मूर्ती मध्ये प्राण-प्रतिष्ठा केली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मी दिघे साहेब यांच्या बदल खूप वाचलं ऐकलं माझ्यासारख्या अभिनेत्याला ९५ चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली याचा मला फार आनंद वाटत आहे. या चित्रपटात ज्या ज्या महारथीनी मला मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो.”

याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.चित्रपटाबद्दल बोलतांना ते म्हणाले की,”आनंद दिघे हे शिवसेनेसाठी एक आधारस्तंभ होते. त्यांचे विचार चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पसरावे हेच आमचे मुख्य हेतू होते. मंगेश देसाई यांनी मी घातलेला घाट पूर्ण केला आहे. प्रवीण तरडे हे आता या चित्रपटाला पुढे नेण्याचे काम करीत आहेत. आमच्या सर्वांचे मुख्य हेतू हेच आहे की, समस्त तरुण वर्गासमोर त्यांचा आदर्श समोर ठेवणे. आनंद दिघे हे नेहमीच स्फूर्तिदायक होते. कधीच कोणाला दुखावत नव्हते. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा ही मी विनंती करतो”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, “धर्मवीर चित्रपट करण्यामागचा हेतू हा आनंद दिघे यांचे विचार प्रत्येक घरात पोहोचवायचा होता. झी स्टुडिओज त्यांच्या प्रेक्षकांसाठी नेहमीच नवीन विषय घेऊन येतो. मराठी चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील नवीन विषयंना भरघोस प्रतिसाद देत राहतो. आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘धर्मवीर’ हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी आशा आहे. आनंद दिघे यांना या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरात पोहोचवू शकू अशी इच्छा मनाशी बाळगून हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत.

तर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,”
कोणत्याही चित्रपटात नेहमी काळ वेळ आणि प्रारब्ध हे अतिशय महत्त्वाचा घटक असतो.मला कधीही वाटलं नव्हत, की मी एक निर्माता होईल,परंतु आज माझं भाग्य आहे की आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची संधी मला मिळाली.आज हा चित्रपट प्रदर्शनाच्या टप्प्यावर आहे हे फक्त आनंद दिघे साहेब यांच्यामुळे ते आज शक्य होऊ शकलं.”

तर हे शिवधनुष्य पेलणं किती अवघड होतं हे सांगतांना लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले की,”,मी वेगवेगळे विषय असणारे चित्रपट बनवले शेतकरी, अध्यात्म, इतिहास या विषयांचे चित्रपट बनवल्यानंतर जीवनपट बनवण्याचा विचार होता,पण कोणाच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवणार हा प्रश्न होता अनेक राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट होऊन गेले पण का झाले माहिती नाही हा समज धर्मवीर हा चित्रपट बदलवणार हे नक्की.आणि झी स्टुडिओज मार्फत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे,त्यामुळे हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध केला जाणार याचा मला फार आनंद होत आहे..”

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील गुरुपौर्णिमा आणि धर्मवीर ही गाणी अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केली आहेत. तर गोकुळाष्टमीचं गाणं आणि आनंद हरपला हे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या जोडीने संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहिर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच गायला आहे. या संगीत सोहळ्याप्रसंगी हे सारे मान्यवर उपस्थित होते.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. आपल्या लोकनेत्याला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला
‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.