Akshay Kumar Ravina Tandon

नव्वदच्या दशकातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे रवीन टंडन. आज २६ ऑक्टोबर रोजी रवीनाचा ४६वा वाढदिवस आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. करिअरसोबतच रवीना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. आज तिच्या वाढदिवशी आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

‘मोहरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्यातील प्रेमाची चर्चा चित्रपट वर्तुळातही पसरल्याचे पाहायला मिळाले होते. १९९९ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने त्यांच्या रिलेशनशिपविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी लग्न करण्याचा विश्वास अक्षयने तिला देऊ केला होता.

खिलाडी कुमार आणि रवीना यांचे अफेअर सर्वज्ञात झाल्यानंतर हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असे अनेकांनाच वाटत होते. पण, बॉलिवूडच्या या जोडीमध्ये एकाएकी दुरावा आला. ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयचे नाव अभिनेत्री रेखासोबत जोडले गेले. या चित्रपटातील एका गाण्यावरुन रवीनासोबत अक्षयचे भांडणही झाले होते. (त्या गाण्यात खिलाडी कुमारसोबत रेखा यांची काही रोमॅण्टीक दृश्य चित्रीत करण्यात येणार होती.)

रेखा आणि अक्षयच्या नावाच्या वाढत्या चर्चा पाहता रवीनासोबतच्या त्याच्या नात्याला तडा गेला. इथे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत रेखा- अक्षयने याविषयी बोलण्यास स्पष्ट नकारही दिला होता. या बहुचर्चित प्रेमप्रकरणामध्ये रवीनाने तिच्या आणि अक्षयच्या नात्यात आलेल्या दुराव्यासाठी रेखा यांनाच दोष दिला होता. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केल्यानुसार रवीनाने अक्षय- रेखा आणि सुश्मिता सेन यांना एकत्र पाहिले होते. मुख्य म्हणजे रवीनाने काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा तिच्या आणि अक्षयच्या नात्याविषयी वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. अक्षयसोबतच्या नात्याविषयी एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती, ‘वारंवार विविध अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेल्यामुळे मला माझ्या एका पत्रकार मित्राने सजग राहण्याचा इशारा दिला होता. पण, प्रत्येकवेळी मी त्याला माफ करेन अशीच त्याची अपेक्षा असायची. जवळपास तीन वर्ष हे असंच सुरु होते.’ नंतरच्या काळात अक्षय कुमारचे शिल्पा शेट्टीशीही नाव जोडले गेले होते.

रवीनाने नंतर अनिल थंडानीशी लग्न केले तर अक्षय ट्विंकल खन्नाशी विवाहबद्ध झाला. या दोघांचे वैवाहिक आयुष्य उत्तम सुरू असून आतासुद्धा ते एकमेकांच्या समोर येणे किंवा एकत्र चित्रपट करणे टाळतात.