महाराष्ट्रात आलेल्या पुराचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात फार मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या न्यूज मध्ये जास्त माहिती येत नसली तरीही पुरानंतर येणारी रोगराई आणि मोडलेली घरेदारे हे चित्र भयावह आहे . या पुरात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. अनेकांची घरे उध्वस्त झाली; तर व्यवसाय, घरदार सारे काही वाहून गेले. या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज अजूनही आहेच. ‘झी युवा’ वाहिनीने,पुढाकार घेत या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘युवा फोर्स’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन वाहिनीद्वारे करण्यात आल्यानंतर, केवळ ३ दिवसात २ हजारांहून अधिक लोकांनी झी युवा च्या अधिकृत नंबर वर मदत करण्यासाठी संपर्क साधला. त्यातून एक युवा तरुण तरुणीची टीम तयार करण्यात आली. युवा फोर्स चे अंदाजे १०० तरुण तरुणी घरात आलेल्या गणपतीची तयारी सोडून माणुसकी दाखवत या पुरग्रस्तांच्या मदतीला धावली.या कार्यात मनशक्ती प्रयोग केंद्र या सामाजिक संस्थेची खूपच मदत झाली .

सध्या श्रावण महिना सुरु आहे . उर्वरित महाराष्ट्रात गोकुळ अष्टमी, दहीहंडी आणि जवळ येणारा गणेशोत्सव सारखे सण सुरु आहेत . आजचा तरुणवर्ग आपली जबाबदारी जाणून घेऊन, सणसमारंभाहून अधिक महत्त्व या मदतकार्याला देताना दिसणं हे खरंच उल्लेखनीय आहे . ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात सगळीकडे गणपतीची तयारी सुरु असताना युवा फोर्स कोल्हापुरातील कुरुंदवाड परिसरात मदतकार्य करत होते. पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला उर्वरित महाराष्ट मोठ्या मनाने उभा राहिला . अनेक सामाजिक संस्थांनी विविध ठिकाणाहून वस्तूंच्या स्वरूपातील मदत या विभागात अगोदरच पोचली होती. परंतु, या उपक्रमाच्या माध्यमातून एक निराळ्या प्रकारची मदत करण्याचा झी युवा वाहिनीने प्रयत्न केला. केवळ वस्तूंच्या स्वरूपातील मदत पुरेशी ठरणार नाही, हे जाणून घेऊन, हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. स्वच्छता व निर्जंतुकीकरण हा या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. याव्यतिरिक्त, प्रथमोपचार व आरोग्य केंद्रांची स्थापना या उपक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात करण्यात आली होती. या मदतकार्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून, तिथल्या लोकांचे ढळलेले मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने विविध मनोरंजनाचे उपक्रम सुद्धा सादर करण्यात आले. लोकांनी त्याच नकारात्मक वातावरणात व मनस्थितीत अडकून राहू नये, यासाठी या मनोरंजनाचे आयोजन केलं गेलं. याशिवाय तिथल्या लहान मुलांसह वेगवेगळे खेळ खेळून, त्यांना नकारात्मक वातावरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मनावरील ताणतणाव हलका होईल याची सुद्धा खबरदारी घेण्यात आली. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक थकवा दूर व्हावा आणि साऱ्यांनाच आयुष्याचा नवा सूर सापडावा यासाठी ‘युवा फोर्स’ ने च्या मदतीने हा उपक्रम राबवला. या कार्यात गेली चाळीस वर्षे लोकांच्या मनशांतीकरीता त्याच प्रमाणे ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारापासून मृत्यृ-पश्चात जीवनापर्यंत अनेक गोष्टीवर मनशक्ती प्रयोग केंद्र ही सामाजिक संस्था त्यांचे तज्ज्ञ शिक्षक घेऊन आले होते .सतत दोन दिवस मुंबई , पुणे सांगली येतुन गेलेली युवा फोर्स सकाळ ते संध्याकाळ घरातील गणपतीची तयारीचे टेन्शन न घेता अतिशय जिद्दीने मिळेल ते काम करत लोकांना मदत करत होती . ‘झी युवा’च्या या उपक्रमांमुळे कुरुंदवाड आणि सांगली मधील लोकांच्या चेहऱ्यावरील हसू नक्कीच परत आले . पण मदतीचा हा हात थांबला नाही पाहिजे याहूनही पुढे युवाफोर्स अशाप्रकारची मदत करत राहील